जळगाव | प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील जमीन खरेदी प्रकरणात मोठा वाद निर्माण झाला असून, आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणूक तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, २००२ साली मानपूर शिवारातील काही जमिनी साखर कारखाना उभारण्याच्या उद्देशाने खरेदी करण्यात आल्या होत्या. यामध्ये गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची होती.
जमीन खरेदी करताना संबंधित कुटुंबाला योग्य मोबदला देण्याबरोबरच तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला ५१ हजार रुपये आगाऊ देण्यात आले, मात्र उर्वरित रक्कम देण्यात आल्याचा आरोप तायडे कुटुंबाने केला आहे.
धक्कादायक उघड
अनेक वर्षे उलटल्यानंतरही संबंधित जागेवर साखर कारखाना उभारला गेला नाही. २०२५ मध्ये या प्रकरणाची माहिती घेतली असता, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असल्याचे तायडे कुटुंबाच्या लक्षात आले.
यानंतर रिपाइं (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत चौकशी केली असता, जमीन खरेदी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून मूळ खरेदीदाराचे नाव बदलल्याचा आरोप समोर आला.
कागदपत्रांमध्ये फेरफार?
११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची पडताळणी केली असता, “तापी-पुर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज” या नावाऐवजी “शारदा एकनाथ खडसे” असे नाव टाकण्यात आल्याचे आढळून आले. कागदपत्रातील काही पानांवरही फेरफार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी ९ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. तक्रारदार चमेलाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
एकनाथ गणपत खडसे
शारदा गणपत खडसे
मध्यस्थ सुधाकर पाटील
तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी
यांच्याविरुद्ध BNS 2023 मधील विविध कलमे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांचे नातू सोनू तायडे यांनी मोबाईलवरून संपर्क साधला असता, संबंधित गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी पुष्टी केली.











